Advt.

Advt.

Friday 6 February 2015

मैत्री कुणाशी करावी? संगत कुणाची धरावी?

 -महावीर सांगलीकर


तुमचे मित्र कोण आहेत यावरून तुम्ही कोण आहात हे कळते. तुम्ही ज्यांच्या सहवासात रहाता त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यांचे गुण आणि दुर्गुण तुमच्यात उतरत असतात.

तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे आणि वाईट लोकांची संगत टाळली पाहिजे.

1. जे लोक बुद्धीने, ज्ञानाने आणि मानाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी मैत्री करावी. त्यांच्या सहवासात राहावे.

2. जे लोक कांहीतरी विधायक काम करत असतात त्यांच्याशीही मैत्री करावी. त्यांच्या कामात शक्य होईल तसा हातभार लावावा.

3. गायक, संगीतकार, कलाकार, खेळाडू, वक्ते, लेखक, पत्रकार, संपादक, उद्योजक, प्रशासनातले अधिकारी, खाजगी उद्योगातील अधिकारी यांच्याशी ओळखी करून घ्याव्यात.

4. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि मनुष्यबळ आहे त्यांच्याशी सलोख्याचे संबध ठेवावेत. वेळप्रसंगी हे लोक तुमच्या उपयोगी पडू शकतात.


यांची संगत धरू नका

1. जातीयवादी, धर्मवादी, भाषावादी, प्रांतवादी आणि इतर सर्व वाद घालणा-या लोकांपासून दूर राहावे.

2. जे लोक तुमचे मन इतर व्यक्तीविषयी अथवा समाजाविषयी कलुषित करतात, त्यांना आपल्या वा-यालाही उभे करू नये. अशा लोकांच्या संघटनांपासूनही दूर राहावे.

3. चहाड्या करणा-या लोकांना ताकीद द्यावी, ते न सुधारल्यास त्यांना दूर करावे.

4. रिकामटेकडे, निरर्थक गोष्टीत तुमचा वेळ वाया घालवणारे, केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी मैत्री करणारे यांची संगत धरू नये.

5. जे स्त्रियांच्या विषयी अनुदारपणे बोलतात, स्त्रियांच्याकडे विकृत नजरेने बघतात त्यांना आपल्यापासून दूरच ठेवावे.

6. व्यसनांच्या अतिआहारी गेलेल्या लोकांपासून दूर राहावे.

7. सर्व प्रकारच्या विद्रोही लोकांच्यापासून दूरच राहावे, कारण हे विद्रोही लोक कोणतेही विधायक काम करत नसतात, तर कुणाच्या तरी विरोधात बोलत/लिहित रहाणे हेच त्यांचे एकमेव काम असते.

8. जे लोक तोंडावर तुमची स्तुती करतात पण माघारी तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांच्याशी संबंध ठेवू नये.

No comments:

Post a Comment